दुर्गा विसर्जन करताना मृत्यूचं तांडव; तब्बल 13 जण खोल नदीत बुडाले

Foto
आग्रा : उत्तर प्रदेश जिल्ह्यातील खेरागढ येथे दसरा सणाच्या दिवशी दुर्दैवी दुर्घटना घडली आहे, या घटनेनं संपूर्ण गावावरती शोककळा पसरली आहे. उटंगन नदीत काल (गुरुवारी 2 ऑक्टोबर) दुपारी मूर्ती विसर्जनावेळी 13 तरूण खोल पाण्यात बुडाले. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात गोंधळ उडाला. स्थानिक ग्रामस्थांनी तत्परता दाखवत विष्णू नावाच्या एका युवकाला वाचवले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध व बचावकार्य सुरू केले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मोहिमेत आतापर्यंत 3 युवकांचे मृतदेह सापडले असून बाकींचा शोध सुरू आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत असून सणासुदीच्या दिवशी संपूर्ण गावावरती शोककळा पसरली आहे.

घटनास्थळी जिल्हाधिकारी अरविंद मलप्पा आणि डीसीपी पश्‍चिमी क्षेत्र अतुल शर्मा दलासह पोहोचले. जखमींना तात्काळ एस.एन. मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले आहे. मात्र, पोलिस पोहोचायला उशीर झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. अधिकार्यांनी समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

घटना कशी घडली?

गाव कुसियापुर येथील चामड माता मंदिरात नवरात्रोत्सवात देवीची मूर्ती बसवण्यात आली होती. दसऱ्यानिमित्त गावातील 40 ते 50 नागरिक, महिला व मुले देवीच्या विसर्जनासाठी उटंगन नदीकाठी गेले होते. यामध्ये विष्णू (20), ओमपाल (25), गगन (24), हरेश (20), अभिषेक (17), भगवती (22), ओके (16), सचिन पुत्र रामवीर (26), सचिन पुत्र ऊना (17), गजेंद्र (17) आणि दीपक (15) असे युवक खोल पाण्यात गेले आणि बुडाले.

रेस्क्यू ऑपरेशन सुरू

ग्रामस्थांच्या मदतीने विष्णूला वाचवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, सुमारे दीड तासानंतर ओमपाल आणि गगन यांना बाहेर काढण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. इतर युवकांचा शोध घेण्यासाठी तब्बल सहा तासांनी एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिस व गोताखोरांच्या मदतीने शोधमोहीम सुरू असून रात्री उशिरापर्यंत 3 मृतदेह हाती लागले आहेत.

पोलीसांचा खुलासा

डीसीपी अतुल शर्मा यांनी सांगितले की, विसर्जनावेळी युवक नदीच्या अधिक खोल पाणी असलेल्या भागात गेले होते आणि त्यावेळी ही दुर्घटना घडली. दोन जणांचा मृत्यू झाला असून एकाला वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित युवकांच्या शोधासाठी ऑपरेशन सुरू आहे.